नाशिकमध्ये पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची कडेकोट नाकाबंदी
नाशिक – महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येत असताना विविध जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमधून नागरिकांना प्रशासनातर्फे शिथिलता देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिक पर्यटनस्थळांकडे मोठ्या प्रमाणात धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे राज्यातील विविध भागांमधील पर्यटनबंदी अद्याप उठवलेली नाही.
नाशिकमधील पर्यटनस्थळांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पोलिसांनी कारवाईसाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, नाशिक परिसरातील गड-किल्ल्यांवर तसेच पर्यटनस्थळांवर कोरोना नियमांचे उल्लंघन करून नागरिक उपस्थित राहत असल्याने पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
नाशिकसह पुण्यातील पर्यटनस्थळांवर देखील नागरिक गर्दी करत असल्याने पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना परत आल्यावर 15 दिवस गृह विलगीकरणात राहावं लागेल, असं स्पष्ट केलं आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक परिसरात मौज मजा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना या सर्व गोष्टींचा विचार करून बाहेर पडावं, अन्यथा त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात व दंडात्मक कारवाई होऊ शकते, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.