अटकसत्र तत्काळ थांबवा अन्यथा मोर्चा काढू: केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा इशारा
कुडाळ : प्रतिनिधी
सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गात सुडाचे राजकारण व दडपशाही सुरू केली आहे. कोणतीही खातरजमा न करता पोलिसांनी सुरू केलेले अटकसत्र तत्काळ थांबवावे. पोलिसांनी सरकारचे ऐकून सत्तेचा दुरुपयोग करू नये. भाजप कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकण्याचे न थांबल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल(ता.२६) पत्रकार परिषदेत दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा बँक निवडणूक आणि नगरपंचायतच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांनी जी दडपशाही, हुकूमशाही चालविली आहे, त्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही चालविली आहे. सुडाचे राजकारण सुरू केले आहे. या दडपशाहीला खतपाणी घालण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर अटकसत्र मोहीम हाती घेतली आहे. मोठ्या प्रमाणात कोणतीही खातरजमा न करता अटकसत्र सुरू केले आहे. हे अटकसत्र त्यांनी तात्काळ थांबवावे. अन्यथा एसपी कार्यालयावर आम्हाला भव्य मोर्चा काढावा लागेल. जिल्हा बँक निवडणूक व चारही नगरपंचायतीवर भाजपा शंभर टक्के यश मिळविणार आहे.