ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रासह देशाच्या १० राज्यांत केंद्राची खास पथके
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
देशात ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये आपली विशेष पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथके तेथील परिस्थितीवर नजर ठेवण्यास आणि परिस्थिती सुधारण्यास राज्यांना मदत करतील. काही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यासाठीही हे पथक काम करील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज येथे दिली.
देशात आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे ४१५ रुग्ण सापडले आहेत. सध्या ख्रिसमस साजरा केला जात आहे. याशिवाय सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. या सर्व प्रकारामुळे गर्दी आणि कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०८ ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल दिल्लीत ७९, गुजरातमध्ये ४३, तेलंगणात ३८, केरळमध्ये ३७, तामिळनाडूत ३४ आणि कर्नाटकात ३१ रुग्ण सापडले आहेत. देशातील ४१५ ओमिक्रॉन रुग्णांपैकी ११५ जण बरे झाले आहेत. देशातील ८९ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. ६१ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत.
११ राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे या राज्यांची बैठक घेऊन लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन त्याचा फैलाव रोखण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या राज्यांमध्ये खास पथके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.