breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपने पुन्हा दाखवला राम शिंदेंवर विश्वास; सालगड्याचा मुलगा ते राजकीय संघर्ष अन आता नगरचं नेतृत्व

अहमदनगर : भाजपने आज विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या पाच उमदेवारांची घोषणा केली असून यामध्ये नगर जिल्ह्यातील पक्षाचे नेते प्रा. राम शिंदे यांचीही वर्णी लागली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काहीसे बाजूला पडलेल्या राम शिंदे यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याने शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. शिंदे यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आल्याने कर्जत-जामखेड तालुक्यात भाजपला आलेली मरगळ दूर होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राम शिंदे यांची विधानपरिषदेवर निवड होणार असल्याचे वृत्त कर्जत जामखेडमध्ये काल सायंकाळी येताच गावोगावी लोकांकडून पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. अनेक दिग्गज नेते स्पर्धेत असताना पक्षाने राम शिंदे यांना विधानपरिषदेसाठी संधी कशी दिली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीचा वेध घेणं आवश्यक आहे.

राम शिंदे आणि राजकीय संघर्ष

प्रा. राम शिंदे यांचा जन्म १ जानेवारी १९६९ रोजी चौंडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडील शंकरराव हे शेतमजूर , दुसऱ्याच्या शेतात सालकरी गडी म्हणून काम करण्यातच त्यांचे अर्धे आयुष्य गेले. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रा. शिंदे यांची जडणघडण झाली. परिस्थितीवर मात करत शिंदे यांनी एम. एस्सी. बीएड शिक्षण पूर्ण केले. राम शिंदे यांनी प्राध्यापक म्हणून आष्टी (जि.बीड) येथे प्रारंभीच्या काळात नोकरी केली. १९९५ साली राज्यात भाजप-शिवसेना युती सरकार आले आणि प्रा. राम शिंदेच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. २५ ऑगस्ट १९९५ रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांनी हजेरी लावली. तत्कालीन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेत या प्रकल्पाची जबाबदारी साहजिकच त्यावेळी उच्चशिक्षित असलेल्या प्रा. राम शिंदे यांच्यावर सोपवली. हीच जबाबदारी प्रा. शिंदे यांच्यासाठी निर्णायक ठरली.

त्यावेळी राम शिंदे यांच्यावर चौंडी विकास प्रकल्पाचे सदस्य म्हणून अधिकृत जबाबदारी मिळाली. हे पद प्रा. शिंदे यांच्या आयुष्यातील पहिले पद. दरम्यान प्राध्यापक म्हणून नोकरीचा राजीनामा देत त्यांनी चौंडी विकास प्रकल्पाला वाहून घेतले. त्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी राजकारणात उडी घेत भाजपतर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडूक लढवली .मात्र मतविभागणीचा फटका बसून २०० मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र आयुष्यातील या पहिल्याच निवडणुकीत पराभव वाट्याला आलेला असला तरी हा पराभव त्यांना खूप काही शिकवून गेला. नंतर तीन वर्षांनी सन २००० मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून प्रा. शिंदे यांनी प्रस्थापिंतांची ४० वर्षांची चौंडीतील सत्ता घालवत एकहाती सत्ता मिळवून सलग पाच वर्ष सरपंचपद मिळवले.

यादरम्यान २००२ जामखेड कृषी बाजार समितीच्या निवडणुकीतील दोन्ही पॅनलमधून प्रा. शिंदे यांना उमेदवारी डावलण्यात आली. मात्र शिंदे यांनी निवडणुकीतून माघार न घेता बाजार समितीच्या दुर्बल घटक मतदारसंघातून अपक्ष निवडूक लढवली. मात्र अवघ्या एका मताने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असाच प्रकार सन २००२ च्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत पाहायला मिळाला. जिल्हापरिषद जवळा गटातून भाजपतर्फे प्रा. शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली होती. त्यांनी जवळा गटात प्रचाराला शुभारंभ केला असताना, जवळा गटातील भाजपातील काहींनी प्रा. शिंदे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. विरोध एवढा तीव्र होता की, शिंदे यांना उमेदवारी दिली तर आम्ही भाजप सोडून इतर पक्षात जाऊ, असा इशारा देत, त्यावेळच्या पक्षश्रेष्ठींना कोड्यात टाकण्यात आले. कसलाही राजकीय वरदहस्त नसलेले प्रा. शिंदे त्यावेळी एकाकी पडले आणि ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात आली. भरलेला उमेदवारी अर्ज काढून, पक्षाशी प्रामाणिक राहण्याचे काम त्यांनी केले.

२००५ मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रा. शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सन २००६ मध्ये भाजपने जामखेड तालुकाध्यक्षपदी प्रा. शिंदे यांची निवड केली खरी, मात्र तालुकाध्यक्षपदी निवड केल्याची अधिकृत घोषणा सहा महिन्याने करण्यात आली. सन २००७ मध्ये प्रा. शिंदे यांनी आपली पत्नी आशाताई यांनी भाजपतर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडूक लढवली आणि मोठ्या फरकाने निवडून आले. त्यांचा विजय भाजपासाठी खूप मोठा होता. जिल्हा परिषद जवळा गटातील भाजपचे उमेदवार अरणगाव गणातून मागे असताना , जवळा गणातून प्रा. शिंदे यांना जी आघाडी मिळाली त्यावरच भाजपचे गटातील उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे याच उमेदवाराने २००२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून प्रा. शिंदे यांना उमेदवारी द्यायाला विरोध केला होता. याच उमेदवाराने निवडून आल्यावर उपकाराची परतफेड अपकाराने करत सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रा शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी देण्याला कडाडून विरोध केला. परंतु यावेळी त्यांचे काही चालले नाही. साहजिकच भाजपकडून शिंदे यांना विधानसभा उमेदवारी मिळाली. राम शिंदे यांना उमेदवारीला विरोध करणारांनी मात्र भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षातील उमेदवाराचे काम केले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयानंतर राम शिंदे यांनी सत्तेच्या विरोधात असतानाही मतदारसंघात विकासकामे करत पकड मजबूत केली. दरम्यानच्या काळात अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षपदी प्रा. शिंदे यांची निवड झाली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१४ मध्ये ते मोठ्या फरकाने निवडून आले. प्रारंभी राज्यमंत्री म्हणून गृह, पणन, आरोग्य व पर्यटन खात्याचे काम करतानाच नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, पणन व वस्रोद्याग या खात्याची जबाबदारी प्रा. शिंदे यांनी पार पाडली. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही खचून न जाता त्यांनी जनतेशी असलेली नाळ तोडली नाही. पक्षाने दिलेली गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. राम शिंदे पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि योगदान पाहून भाजपा प्रदेश कोअर कमिटी सदस्य म्हणूनही त्यांना नुकतीच जबाबदारी दिली आहे. शांत, संयमी नेतृत्व म्हणून शिंदे यांची ओळख असली तरी जनतेच्या प्रश्रासंदर्भात मात्र ते कायम आक्रमक राहिलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button