… तर वाचकांसह लेखकही दखल घेतील : विश्वास पाटील
पहिले पुष्प : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमाला
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
जीवनात घडत असलेल्या साध्या व छोट्या घटना, प्रसंगांमधून बोध घेत समर्पक कल्पना आणि उत्तम शब्दांद्वारे लेखन केल्यास, साहित्य समीक्षकांसह वाचक देखील त्या लेखकाची नोंद घेतात, असे मत ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे दि. १३ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेमधील पहिले पुष्प ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी गुंफले. महानायक ते महासम्राट या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी, ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील आणि आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साहित्य अमृत ग्रंथोस्तव व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, उपआयुक्त रविकिरण घोडके, विठ्ठल जोशी, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, उमाकांत गायकवाड, विजयकुमार थोरात, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राजन लाखे, ज्ञानगंगा प्रकाशनाचे उमेश पाटील, जगत्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह संतपीठ तसेच महापालिकेच्या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.
स्वराज्यासाठीचा संघर्ष प्रेरणादायी…
इतिहासाचा अभ्यास करत असताना तत्कालीन सर्वांगीण राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती समजावून घेतली पाहिजे, असे नमूद करून विश्वास पाटील म्हणाले, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंचा स्वराज्यासाठीचा संघर्ष हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मावळ परिसरात स्वराज्याची यशस्वी जडणघडण होण्यामागचे कारण शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी या परिसरात निर्माण केलेली राज्यव्यवस्था आणि देशपांडे, देशमुख तसेच परिसरातील सरदार यांच्याद्वारे केलेला राज्यकारभार होय. याठिकाणी असलेल्या लोकांचा योग्य उपयोग त्यांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी केला. शहाजीराजे यांच्या ऐतिहासिक संदर्भांची मांडणी देखील विश्वास पाटील यांनी केली.