तेव्हा… ‘तुम्ही नागपुरी बांगड्या भरला होत्या का?’, भाजप आमदारांना रोहिणी खडसेंचा सवाल
पुणे |महाईन्यूज|
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातीळ वादात माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी उडी घेतली होती. यावेळी त्यांनी खडसेंवर हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर सातपुतेंना उत्तर देताना एकनाथ खडसेंच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी ‘तुम्ही नागपुरी बांगड्या भरला होत्या का?’ असा सवाल केला. त्यानंतर रोहिणी खडसे आणि सातपुते यांच्यात ट्विटरवर शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले.
‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर बोलताना ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊबद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल’ असं ट्वीट राम सातपुतेंनी केलं होतं.
‘अहो, जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?’ अशी घणाघाती टीका रोहिणी खडसेंनी केली.
यानंतरही सातपुते यांनी दुसर्यांदा ट्वीट करत ‘ताई भोसरी जमीन घोटाळ्यामुळे मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंचं. या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तीच कारवाई झाली ना तेव्हा. आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..!’ असा टोला लगावला.