पुणेमहाराष्ट्र
सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली : राज्यपाल
मुंबई l प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (दि. ४) रात्री निधन झाले. त्यांनी पुण्यातील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई यांच्या जाण्याने अनेकांनी शोक व्यक्त केला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देखील सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले.
स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत.
या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.