शिळा भात ठरला विवाहितेच्या छळास कारणीभूत
अगदी शुल्लक कारणांवरून सुनेचा छळ केल्याच्या घटना आजवर ऐकल्या आहेत. अशीच एक घटना नवी सांगवी येथे घडली असून सुनेचा छळ करण्यास शिळा भात कारणीभूत ठरला आहे. त्यासोबत घरगुती अन्य कारणांवरून देखील सुनेचा छळ करण्यात आला आहे. हा प्रकार 15 सप्टेंबर 2019 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत घडली आहे.
पती सारंग सुभाष सकपाळ (वय 35), सासू (दोघे रा. नवी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने मंगळवारी (दि. 4) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि सारंग सकपाळ यांचा विवाह झाल्यानंतर आठ महिने त्यांचा संसार व्यवस्थित झाला. त्यानंतर पती आणि सासूने विवाहितेचा शारीरिक व मानसिक जाचहाट केला. टोचून बोलून विवाहितेला वेळोवेळी अपमानित केले. ‘तुला स्वयंपाक, काम नीट करता येत नाही’ असे म्हणत सासूने विवाहितेच्या माहेरच्या लोकांना नावे ठेवली. ‘तू शिळा भात खाल्ला कि फेकून दिला’ असे म्हणत हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.