भीषण अपघात! कारने दोन ते तीन वेळा घेतली पलटी; एक ठार, चार गंभीर जखमी
जळगाव | धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ एका कारला झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर बाकी चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. भैय्या मधुकर खलसे (रा. शेंदुर्णी ता. जामनेर), असं मयत तरुणाचं नाव आहे. अपघात इतका भयानक होता की, कारने दोन ते तीन वेळा पलटी मारली.
रविवारी दुपारी साधारण अडीच वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथील पाच तरुण टाटा मांजा या कारमधून धरणगावकडून चोपडा येथे एका लग्न समारंभात जात होते. रोटवद गावाजवळ कार चालवणाऱ्या चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्यालगतच्या पाठचारीतून थेट इलेक्ट्रिक पोलला धडकली. कारने दोन ते तीन वेळा पलटी मारली. यामुळे भैय्या मधुकर खलसे (रा. शेंदुर्णी ता. जामनेर) हा तरुण जागीच ठार झाल्याची माहिती पोलीस पाटील नरेंद्र शिंदे यांनी दिली.
एकाची प्रकृती अतिगंभीर
कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती अतिगंभीर असल्याचं देखील श्री. शिंदे यांनी सांगितलं. अपघाताची माहिती मिळताच सह. पोलीस निरीक्षक गणेश आहिरे, पोलीस हेड काॅन्स्टेबल ईश्वर शिंदे, वैभव बाविस्कर, प्रदीप पाटील, गजेंद्र पाटील, श्री. सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जखमींना जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आलं होतं. तर धरणगाव पोलिसात अद्याप या अपघाताबाबत कुठलीही नोंद नव्हती.