सातारा : अवघ्या १५ तासांत कोयना धरण आठ टीएमसीहून अधिक भरले
कराड – महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी पहाटेपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात प्रतिसेकंद तब्बल दीड लाखाहून अधिक क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे.
बुधवार सायंकाळी पाच वाजता धरणात ५८.५१ टीएमसी पाणी होते. गुरुवारी सकाळी सहा वाजता धरणात ६६.७५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.त्यामुळेच धरणात अवघ्या अकरा तासात ८.२५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.महाबळेश्वर, नवजा, कोयना या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे.मागील अकरा तासात कोयना धरणात सरासरी ८४ हजार ४१६ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.तर पहाटे पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत या एक तासात धरणातील पाण्याची आवक १ लाख ५४ हजार ९ क्युसेक पर्यंत पोहोचली आहे.त्यामुळे पहाटेपासून कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री पायथा वीजगृहातून २० मेगावॅट वीज निर्मितीनंतर प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.आज सकाळी हे पाणी सोडले जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत अगोदरच मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.त्यातच आता कोयना धरणाचा पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.कृष्णा तसेच कोयना नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.मागील ११ तासात कोयना येथे २९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.नवजा येथे ३८५ तर महाबळेश्वरमध्ये तब्बल ४०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.