फडणवीसांनी सिंह गिधाडाला घाबरत नाही म्हणत दिलेल्या सल्ल्यावर संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…
मुंबई |
शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुंबईत शिवसेनाच दादा असल्याचं म्हणत आम्ही घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल असं म्हणत फडणवीसांना आव्हान दिल होतं त्यानंतर यावर देवेंद्र फडणवीसांनी सिंह कधी गिधाडाला घाबरत नाही, असं म्हणत राऊतांना प्रत्युत्तर दिलं. तसंच संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता येऊन मनोरंजन करतात असा टोला लगावला होता. त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी कोर्टासमोर ती मांडावी असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला होता. दरम्यान दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात बोलावं असा सल्ला दिल्यासंबंधी सांगितलं असता ते म्हणाले की, “मी कोर्टात बोलणारच आहे. मी काल संसदेत मुद्दाम बोललो नाही. तिथे वीर सावरकरांचं गाणं गायल्याबद्दल ह्रदयनाथ मंगेशकरांना त्यांची नोकरी गमवावी लागली असं सांगण्यात आलं. मला कळायला लागल्यापासून मी ते ‘सागरा प्राण तळमळला’ गाणं आकाशवाणीवरुनच ऐकलं आहे. हे गाणं लोकप्रिय कऱण्याचं काम आकाशवाणीनेच केलं आहे. माणसाने किती खोटं बोलावं. घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये. पण मी त्यांना वंदन करतो”.
“माझ्या माहितीनुसार असं कुठेही रेकॉर्डमध्ये नाही. मी ऑल इंडिया रेडीओचे प्रमुख महेश केळुसकर यांचं निवेदन ऐकलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं आहे. जर एखादं गाणं निर्माण केल्याबद्दल, गायल्याबद्दल एखाद्या संगीतकाराला काढलं असेल तर ते गाणं आकाशवाणीवर लावतील का? आजही मी आकाशवाणी, दूरदर्शन, टीव्हीवर ऐकतो. हे गाणं आमच्या ह्रदयात आहे. मंगेशकर भगिनी तसंच ह्रदयनाथ मंगेशकरांनी हे गाणं फार वरती नेऊन ठेवलं आहे. आमची सावकरांची भक्ती आहे. आमची नौटकं नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. गोव्याच्या निवडणुकीमुळे हा उल्लेख झाला असावा का असं विचारण्यात आलं असता राऊत म्हणाले, “ते महान पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी कोणी झालं नाही आणि नंतर होणार नाही असं दिसत आहे. मी त्यांचा आदर करतो. ते मोठे नेते आहेत. मला त्यांच्याविषयी काही फार बोलायचं नाही”.
- महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर टीका…
“कोणाला गुडघे टेकायचे असतील, कोणाला महाराष्ट्राची लाज बाहेर काढायची असेल तर काढावी. काल त्यांनी तेच केलं ना…महाराष्ट्र करोनाचा सुपर स्प्रेडर? महाराष्ट्राने जगात सर्वोत्तम काम केलं. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये बेवारसपणे प्रेतं नाही फेकली. किती खोटं बोल आहात आपण. महाराष्ट्रातील भाजपाच्या एका तरी नेत्याने यावर निषेध सोडा पण साधी नाराजी तरी व्यक्त करावी. हे तुमचं महाराष्ट्रप्रेम आणि हा तुमचा महाराष्ट्र बाणा,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“दिल्लीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचा युगपुरुष मानलं जातं. या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. राजकारणाची नाव घेतात ते सोडून द्या, पण बाणा आमच्याकडे आहे,” अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली.
शिवसेना मुंबईचा दादा आहे या वक्तव्यावरुन होणाऱ्या टीकेसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “हो आहेच..यावरुन टीका करण्यात कारण काय? बाळासाहेब नेहमीच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि शिवसेना निर्मितीनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली नाहीतर कधीच बाहेर गेली असती. मुंबई ओरबाडण्याचे अजूनही प्रयत्न सुरु आहेत”.
- देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही. ईडी काय करते, का करते हे ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता येऊन मनोरंजन करतात. यापेक्षा जास्त त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं जाऊ शकत नाही. त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी कोर्टासमोर ती मांडावी,” असं फडणवीस म्हणाले.
- “दिवसभर आपलंच नाव चर्चेत राहावं असं वक्तव्य करतात”
“संजय राऊत संपादक आहेत. त्यांना माहिती आहे की हेडलाईन कशी द्यायची. दिवसभर आपलंच नाव चर्चेत राहावं असं ते वक्तव्य करतात,” असं म्हणत फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधला. तसेच मोदी सरकारने कुणावरही अन्याय केलेला नाही. मोदी सरकारमध्ये असं कधीही होत नाही, असं म्हणत ईडीबाबतच्या आरोपांचं फडणवीसांनी खंडन केलं.