SA vs IND : आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान, भारत सामन्यात वरचढ
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली आहे. आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान देण्यात भारतीय संघ यशस्वी झाला आहे. दुसऱ्या डावात भारताचा डाव १७४ धावांत गुंडाळण्यात आफ्रिकेला यश आलं. परंतू सेंच्युरिअनच्या खेळपट्टीचा अंदाज घेता अखेरचा दिवस मैदानात तग धरुन भारतीय गोलंदाजीचा सामना करणं हे आफ्रिकेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
तिसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाने दुसऱ्या डावात १ विकेट गमावत १६ धावांपर्यंत मजल मारली. यावेळी भारताकडे १४६ धावांची आघाडी होती. अखेरच्या दिवशी सेंच्युरिअनचं वातावरण पुन्हा ढगाळ असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे भारतीय संघ चौथ्या दिवशी कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष होतं.
परंतू दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. नाईट वॉचमन शार्दुल ठाकूर रबाडाच्या बॉलिंगवर माघारी परतला. यानंतर भारतीय डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. सर्वच महत्वाचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांनी मोक्याच्या क्षणी जास्त धावा करण्याची संधी गमावली. मधल्या फळीत ऋषभ पंत आणि रविचंद्रन आश्विनने छोटेखानी भागीदारी करुन भारताला आव्हानात्मक आघाडी मिळेल याची काळजी घेतली. परंतू ते देखील फारकाळ तग धरु शकले नाहीत.
आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात कगिसो रबाडा आणि जेन्सनने प्रत्येकी ४-४ तर एन्गिडीने २ विकेट घेतल्या. त्यामुळे उर्वरित दिवसाच्या खेळात आफ्रिकन फलंदाज भारतीय गोलंदाजीचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.