राज्यांतर्गत प्रवासासाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक – अजित पवार
मुंबई – महाराष्ट्रात येणार्यांना प्रत्येकाला आता कोरोनाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलेे. कोरोनाच्या नियमावलीत काही प्रमाणात तफावत होती. मात्र आता सर्व नियम एकसारखे पाहिजेत. त्यामुळे आता भारतातील कोणत्याही विमानतळावर प्रवासी आले तर त्यांच्यासाठी नियम सारखेच असावेत, यासाठी नियमावलीत बदल करण्यात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार पुढे म्हणाले की, इतर राज्यातून दुसर्या राज्यात जाताना कोरोना आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट दाखवावाच लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात येताना देखील रिपोर्ट दाखवावा लागेल. कोरोनाच्या तिसर्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेतलेली बरी, असे अजित पवार म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी, मुंबईच्या महापौरांनी, देशपातळीवर नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे नियम बदलण्यात आलेले आहेत. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन टास्क फोर्ससोबत बैठक करुन निर्णय घेऊ. असे पवार म्हणाले.
कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा खुल्या करण्याबाबत शिक्षणमंत्र्यासोबत चर्चा करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे अजित पवार म्हणाले.