आपल्याला ‘अलेक्सा’ म्हणणाऱ्या नितेश राणेंना रोहित पवारांचा टोला, म्हणाले…
अहमदनगर : भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली. नितेश यांनी ट्विटमधून रोहित पवार यांना अलेक्सा म्हटलं आहे. या टीकेला आता रोहित पवारांनी उत्तर दिल आहं. एखादा मुद्दा चुकीचा असेल आणि त्याबाबतीत बोलले तर बरं होईल. एखादी बातमी व्हावी या विशिष्ट हेतूने त्यांनी हे ट्विट केलं असावं, असं म्हणत रोहित पवारांनी नितेश राणेंना टोला लगावला. पवार साहेब हे आपले आवडते नेते असल्याचं नारायण राणे स्वतः सांगतात. मात्र, तुम्ही शरद पवारांविरोधात बोलता. म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षपणे वडिलांच्या विरोधात बोलता की काय? असा प्रश्न उपस्थित होतो, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी यांनी दिलं. राजकारणात विरोध असू शकतो. पण चर्चा होणंही महत्त्वाचं आहे. चर्चा करायची असेल तर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या आणि राज्यातील जनतेच्या बाजूने चर्चा करणं अधिक योग्य राहिल, असं रोहित पवार म्हणाले.
भाजप धर्माकडे राजकीय दृष्टिकोनातून बघतो. जाती-धर्मावर सतत राजकारण भाजपकडून केलं जातं, असा आरोप रोहित पवार यांनी केला. पवार साहेबांनी म्हटलेली कविता ऐकली तर पूर्वी जो जातीवाद व्हायचा त्याविरोधात ती कविता आहे. भाजपने त्या कवितेतील काही भाग सोशल मीडियावर ट्विट केला आणि धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असं रोहित पवार बोलले. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत पाठीत खंजीर खुपसला असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पंचायत समितीत काय झालं, याबाबत मी काही अभ्यास केलेला नाही. मात्र, जिल्हा पातळीवरील गोष्टी स्थानिकांना माहिती असतात, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ऊसाच्या लागवडीत ४० टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे राज्यात यंदा अतिरिक्त ऊसाचं उत्पादन झालं आहे. असं असलं तरी सर्व ऊसाचं गाळप करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ऊस गेला नाही म्हणून बीड मध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. असं कोणीही करू नये, असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं.