राज्यात उकाडा वाढल्याने विजेची मागणीही वाढली; महावितरणसमोर आव्हान
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला आहे. येत्या दिवसात हा उकाडा कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान उकाडा वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. १५ मार्च या एका दिवसात राज्यभरात २७ हजार २१२ मेगावॉट वीज वापरली गेल्याची आकडेवारी समोर आली असून मुंबईत सर्वाधिक वीज वापरली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंदा हिवाळा अधिक तीव्र होता त्यानुसार उन्हाळा तेव्हढाच उष्ण असणार असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. म्हणूनच यंदा विजेची मागणीही वाढली आहे. मुंबईत एका दिवसात 3600 मेगावॅट वीज वापरली गेली आहे. तसेच राज्यात वीजेचा वापर सरासरी 24 हजार मेगवॅटपर्यंत पोहोचण्याचा महावितरणचा अंदाज आहे.
दरम्यान, आधीच कोळशाचा तुटवडा आणि त्यात आर्थिक अडचणीत सापडलेल्या महावितरणला ही मागणी पूर्ण करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. उपलब्ध वीज राज्याला पुरावी यासाठी नागरिकांनी कमी वीज लागणारे दिवे, इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरावी असं आवाहन महावितरणनं केलंय.
कोळशाची टंचाई असतानाही मागणी तेव्हढा पुरवठा केला असल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मागणीप्रमाणे तब्बल 23 हजार 605 मेगावॅट वीजेचा सुरळीत व अखंडित वीजपुरवठा केला असल्याचे महावितरणने म्हटले. गेल्या महिन्याभरात वीजेच्या उच्चांकी मागणीचा विक्रम घडला आहे. याआधी 19 फेब्रुवारी रोजी महावितरणकडून 23 हजार 286 मेगावॅटची मागणी पूर्ण केली. त्याआधी 8 फेब्रुवारी रोजी 23 हजार 75 मेगावॅट, 12 फेब्रुवारी रोजी 23 हजार 163 मेगावॅट इतक्या मागणीप्रमाणे वीज पुरवठा करण्यात आला होता.