गणेशोत्सवासाठी एसटीचे विक्रमी आरक्षण; आप्तकालीन स्थितीसाठी १०० बसची तरतूद
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्यात आता गणेशोत्सवाला अवघा आठवडा उरला असताना या उत्सवासाठी एसटीचे विक्रमी आरक्षण झाले आहे. यंदाच्या उत्सवासाठी २,९३४ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून ४२७ गाड्यांचे आरक्षण सध्या सुरू आहे. करोनापूर्व काळात म्हणजे २०१९ रोजी २,१३० बस आरक्षित झाल्या होत्या. २०२०,२०२१ मध्ये करोना प्रभावामुळे मुंबईच्या बहुतांश चाकरमान्यांना गौरी- गणपतीसाठी कोकणात आपल्या गावी जाता आले नव्हते. यंदा मात्र त्यांच्यात कमालीचा उत्साह आहे. २०१९च्या तुलनेत यंदा बाराशे आरक्षित बस गाड्यांची भर पडली आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागांतून एकूण ३,३६१ गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २२ ऑगस्टपर्यंत (जाताना) १९१२ बस समूहाने आणि १०२२ बस पूर्ण आरक्षित झाल्या आहेत. कोकणातून परतण्यासाठी ८५४ गाड्यांचे आरक्षण झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. कुर्ला ते सावंतवाडीदरम्यान कोकण भवन, वाकण फाटा, लोणेरे फाटा, कशेडी, संगमेश्वर, तराडा या ठिकाणी एसटीचे दुरुस्ती पथक कार्यरत असणार आहेत. मुंबई -गोवा महामार्गाची स्थिती या ठिकाणी असलेल्या आगार आणि स्थानकात प्रत्येक ठिकाणी १० अतिरिक्त टायर तयार ठेवण्याच्या सूचना आहेत.
गणेशोत्सवातील एसटी वाहतूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी संबंधित प्रदेशातील पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक विभागीय अधिकारी, एक सहा. वाहतूक अधीक्षक, एक वाहतूक निरीक्षक आणि दोन वाहतूक नियंत्रक या अधिकाऱ्यांचा यांत समावेश आहे. चालकाने मद्यपान केलेले नाही ना हे तपासण्याचे मुख्य काम यांच्याकडे असणार आहे. मार्गावर धावणाऱ्या गाड्या सुस्थितीत गंतव्य स्थानी पोहोचतील, याबाबत देखरेख या अधिकाऱ्याकडून ठेवण्यात येणार आहे, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात सर्वत्र अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण रेल्वे किंवा मध्य रेल्वे मार्गावर पावसामुळे दरड कोसळून आप्तकालीन स्थिती निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून १०० बस राखीव ठेवाव्यात, अशी सूचना महामंडळाने केली आहे.