देशात नव्या ३८ हजार ९४९ कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली – राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या आठ हजारांच्या आसपास स्थिर झाली आहे. त्यात फारशी घट होत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी दिवसभरात ८ हजार १० नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ६१ लाख ८९ हजार २५७ इतकी झाली आहे. तसेच पूर्ण देशात काल दिवसभरात ३८ हजार ९४९ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ५४२ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. तसेच ४० हजार ०२६ जणांनी कोरोनावर मात केली. यासह देशभरात आतापर्यंत ३ कोटी १ लाख ८३ हजार ८७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ४ लाख ३० हजार ४२२ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुंबईत गुरुवारी ५४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर अवघा ०.०७ टक्के आणि रुग्ण दुप्पटीचा कालावधीही ९४८ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र असे असले तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तविला जात आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण खबरदारी घेणे आवश्यक आहे. मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुवणे आणि गर्दीत जाणे टाळणे अनिवार्य आहे.