अजान सुरू असताना भोंगे लावून हनुमान चालिसा पठण
वाराणसी |महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदीवरील जिथे जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावून हनुमान चालिसा पठण सुरू केले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आता वाराणसीतही मनसे इफेक्ट दिसत आहे. वाराणसीतही लाउडस्पीकरवरुन हनुमान चालीसा पठण सुरु केले आहे.
वाराणसीतील श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ति आंदोलनाने लाउडस्पीकरवरुन हनुमान चालीसा पठण सुरू केलं आहे. मशिदीत अजान सुरू होताच हनुमान चालीसा पठण केले जात आहे. घराच्या छतांवरही लाउडस्पीकर लावण्यात आले आहेत. वाराणसीच्या साकेत नगर परिसरात आंदोलनाचे अध्यक्ष सुधीर सिंह यांनी त्यांच्या घरापासून या आंदोलनाची सुरुवात केली आहे.
जेव्हा अजान सुरू होईल तेव्हा अशाप्रकारे लाउडस्पीकरवरुन हनुमान चालीसाचे पठण केले जाईल, असं त्यांनी सांगितले. तसंत, समाजात तेढ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. काशीमध्ये पहाटेही मंदिरात वैदित पाठ आणि पूजा- अर्चना व हनुमान चालिसाचे पठण केले जायचे. मात्र, दबावामुळं हे सर्व आता बंद झालं आहे.
ध्वनि प्रदूषणाचे कारण देत मंदिरावरील लाउडस्पीकर हटवण्यात आले. मात्र,मशिदीवरील लाउडस्पीकर अद्याप हटवण्यात आले नाहीत. पहाटे ४.३० वाजल्यापासूनच अजानची बांग होती, असं सुधीर सिंह यांनी कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत म्हटलं आहे.
अजानचा आवाज येताच आम्ही मंदिरातून वैदिक मंत्र आणि हनुमान चालीसाचे पठण लाउडस्पीकरवर करणार आहोत. अजानच्या आवाजावरुन आम्ही कित्येतदा आक्षेप घेतला होता. अजान होत असताना लाउडस्पीकरचा आवाज कमी करावा जेणेकरुन आम्हाला त्रास होणार नाही, अशी तक्रार अनेकदा केली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.