वास्तव नाकारून चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे आहेत- शरद पवार
मुंबई – मागील काही दिवसांपासून फक्त शहरी भागातच नव्हे तर राज्यातील सर्व भागात कोरोनाने कहर केला आहे. सर्व जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
सध्या राज्यासह देशात जशी गंभीर परिस्थिती आहे, अशी स्थिती याआधी कधीच नव्हती. हेे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही. लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लावण्याशिवाय पर्याय नाही. आपल्या सर्वांना कोरोना संकंटाचा सामना करावा लागेल. समाजातील सर्व घटकांनी सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.
वाचा :-राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज!
कोरोनाचं हे संकंट परतवून लावण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत आहेत. या यंत्रणेवर ताण येऊ नये यासाठी राज्यात कठोर निर्बंध लावावेच लागत आहे. या निर्बंधांमुळे समाजातील कष्टकरी,व्यापारी, शेतकरी आणि इतर समाजातील घटकांना त्रास होत आहे. पण आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असं पवार म्हणाले.
दरम्यान, या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. याला केेंद्र सरकारची देखील साथ लाभली आहे. कालच मी केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही महाराष्ट्राच्या पाठिशी आहोत असं आश्वासन त्यांनी दिलं आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली.