रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्र साखळीतच गारद
सुलतानपूर | अखेरच्या दिवशी तब्बल ३५७ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठून उत्तर प्रदेशने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला सहा गडी राखून पराभवाचा धक्का दिला. या विजयासह त्यांनी ग-गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर महाराष्ट्राबरोबरच विदर्भावरही साखळीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली.
शनिवारच्या ४ बाद ८४ धावांवरून पुढे खेळताना ५ बाद २११ धावांवर महाराष्ट्राने दुसरा डाव घोषित केला. राहुल त्रिपाठीने ११० चेंडूंत नाबाद १२३ धावांची खेळी साकारली. त्यामुळे पहिल्या डावात आघाडी मिळवणाऱ्या महाराष्ट्राने उत्तर प्रदेशसमोर विजयासाठी ७३ षटकांत ३५७ धावांचे लक्ष्य ठेवले.
उत्तर प्रदेशने मात्र आक्रमक पावित्रा अवलंबताना ७०.१ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. कर्णधार करण शर्मा (११६) आणि सलामीवीर अल्मस शौकात (१००) यांनी शतके झळकावून उत्तर प्रदेशच्या विजयाची पायाभरणी केली. पहिल्या डावातील अर्धशतकवीर िरकू सिंगने अवघ्या ६० चेंडूंत नाबाद ७८ धावांची झंझावाती खेळी साकारून उत्तर प्रदेशला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
उत्तर प्रदेशने तीन सामन्यांतील १३ गुणांसह अग्रस्थान पटकावले. तर महाराष्ट्राला आठ गुणांसह तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
ग-गटातील अन्य लढतीत, विदर्भाने आसामवर पाच गडी राखून मात केली. परंतु सर्व गटविजेत्यांसह दुसऱ्या स्थानावरील एकच सर्वोत्तम संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार होता. त्यामुळे अ-गटातील केरळने (१३ गुण) दुसऱ्या स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला. तर विदर्भाचे (१२ गुण) एका गुणाच्या फरकाने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
संक्षिप्त धावफलक
’ महाराष्ट्र (पहिला डाव) : ४६२
’ उत्तर प्रदेश (पहिला डाव) : ३१७
’ महाराष्ट्र (दुसरा डाव) : ५ बाद २११ डाव घोषित
’ उत्तर प्रदेश (दुसरा डाव) : ७०.१ षटकांत ४ बाद ३५९ (करण शर्मा ११६, अल्मस शौकात १००, रिंकू सिंग ७८; मुकेश चौधरी १/७२)
’ सामनावीर : रिंकू सिंग
’ गुण : उत्तर प्रदेश ६, महाराष्ट्र