‘राहुल गांधींनी बोलताना तारतम्य बाळगण्याची गरज आहे’; रामदास आठवलेंचा सल्ला
नागालँड प्रमाणे शरद पवार यांनी एनडीएबरोबर यावं
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही कायद्यानुसार आहे. यामध्ये भाजपाचा काहीही संबंध नाही. गांधींनी अनेकवेळा चुकीची वक्तव्ये केली आहेत. एकवेळ त्यांना माफीही मागावी लागली. त्यामुळे राहुल गांधींनी बोलताना तारतम्य बाळगण्याची गरज आहे, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिला आहे.
नागालँडमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर आहे. त्याच पद्धतीने शरद पवार यांनी एनडीएबरोबर यावं. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. तसेच, मोदींनी अनेकवेळा पवारांचं कौतुकही केलं आहे. त्यामुळे त्यांनी कितीही विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तरी २०२४ मध्ये पुन्हा एनडीएचीच सत्ता येणार आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचा गर्दी जमवण्यात हातखंडा आहे. तरी, भोंग्याचा मुद्दा वाढवू नये. भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील, याचा त्यांनी विचार करावा. लोकांना भावनिक पातळीवर आवाहन करण्याऐवजी त्यांनी विकास कामांना महत्वा देउन आपला पक्ष वाढवावा, असं रामदास आठवले म्हणाले.
राज्यातल्या शिवसेनेच्या आणि सत्ता संघर्षांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागेल. शिवसेना पक्ष आणि चिन्ह घालवण्यास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ आली नसती, असं रामदास आठवले म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाला दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. यापैकी शिर्डी लोकसभा मतदार संघामधून स्वत: मैदानात उतरण्याची तयारी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार, असंही रामदास आठवले म्हणाले.