अजितदादा नंतर ‘अनलॉक’ बाबत राजेश टोपेंचेही सूचक विधान
मुंबई: गेल्या जवळपास २ वर्षांपासून देशात महामारीचं संकट थैमान घालत आहे. राज्यात देखील महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन, अनेक नागरिकांचे जीव गेले. राज्य हे मृतांच्या आणि बाधित रुग्णांच्या संख्येत क्रमांक एकवर आलं. मात्र, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतले मंत्री याचं खापर केंद्रावर फोडत आहेत, तर विरोधकांनी याला ठाकरे सरकारचं कसं जबाबदार आहे, हे दाखवण्याचा चंग बांधला आहे. मात्र, यात नुकसान राज्यातल्या नागरिकांचचं होत आहे.
दरम्यान, राज्यातली दुसरी लाट आता गेल्यात जमा आहे. काही प्रमाणात का होईना राज्य आणि केंद्र सरकारने आपली जबाबदारी ओळखून, हातात हात घालून काम केल्याने, राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे. तसेच, लसीकरण आणि निर्बंध यांमुळे देखील हा परिणाम साध्य झाला आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातले निर्बंध अजूनही पूर्णपणे हटवण्यात आले नाहीयेत.
या पार्श्वभूमीवर आज, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, राज्यात अनलॉक कधी होणार, याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील, “दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत पुढच्या २ दिवसात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे,” असं मोठं सूचक विधान केलं होतं. त्यामुळे, लवकरच राज्यातील दोन डोस घेतलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असण्याची शक्यता आहे.