१९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन
नवी दिल्ली – कोविड प्रोटोकॉलचे पालन करून संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार, १९ जुलै २०२१ पासून सुरू होत आहे. हे अधिवेशन शुक्रवार १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत चालणार आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सोमवार १९ जुलै २०२१ पासून शुक्रवार १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत कामकाज होईल. यासंदर्भात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या कार्यालयाने आवश्यक ते आदेश काढले आहेत. पावसाळी अधिवेशनात राज्यसभेच्या १९ बैठका होणार असून आवश्यकता भासल्यास अधिवेशनाचा कालावधी परिस्थितीचा आढावा घेऊन वाढवला जाऊ शकतो.
ताज्या आकडेवारीनुसार लोकसभेच्या ४४४ आणि राज्यसभेच्या २१८ सदस्यांनी कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह निवडक खासदारांनी लसचे दोन्ही डोस घेतले आहेत.
दरम्यान, पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड या दोन राज्यांसह एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुका डोळयांपुढे ठेवून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक पवित्रा घेऊन सरकारवर हल्ला चढवण्याची शक्यता आहे.