यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार! पुराच्या पाण्यात ३५ जनावरं गेली वाहून
यवतमाळ |
राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. सोमवारी पुणे, सातारा, यवतमाळसह काही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला. मेघगर्जना आणि विजांच्या प्रचंड कडकडाटात मुसळधारांनी पुणे शहराला अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे शहरासह उपनगरांमधील सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. या पावसामुळे सिग्नल, वीजपुरवठा खंडित होऊन संपूर्ण व्यवस्थाच कोलमडली असल्याचे चित्र होते. शिवाय शहरात अनेक ठिकाणी झाडं कोसळली असून शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तर, यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे काही भागात पूर आला आणि या पुरात तब्बल ३५ जनावरं वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
महागाव तालुक्यातील बेलदरी गावात एका ओढ्याला सोमवारी सायंकाळी पूर आला आणि या पुरात तब्बल ३५ जनावरं वाहून गेली आहेत. आधी ओढ्यात अडकलेली जनावरं पाणी वाढल्यानंतर वाहून गेली आहेत. काल दिवसभर बेलदरी गावात जोरदार पाऊस झाला त्यामुळे गावानजिकच्या ओढ्याला पूर आला होता. गुराखी संध्याकाळी गुरं गावात घेऊन येत असताना ही घटना घडली आहे. जोरदार पाऊस असल्याने आणि अंधार पडल्यामुळे पशुपालकांना गाईंचा शोध घेता आला नाही. या घटनेमुळे पशुपालकांचं मोठं नुकसान झालं आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिलंय. भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ ते ५ दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. विजा चमकताना बाहेरची कामं टाळा, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.