लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गोठ्यावर वीज कोसळल्याने गोठा जळून खाक
लातूर: लातूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. विविध ठिकाणी दोन ते अडीच तास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली. तर शहरात नागरिकांची आणि फेरीवाल्यासह भाजी विक्रेत्यांनी एकच धांदल उडाली.
वीज कोसळल्याने गोठा जळून खाक
रेणापूर तालुक्यातील फावडेवाडी येथे जनावरांच्या गोठ्यावार वीज कोसळल्याने गोठा जळून खाक झाला. यात जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती नाही. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणली. पण, यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं.पानगाव परिसरातील माणिक केंद्रे, ज्ञानोबा केंद्रे, तुकाराम केंद्रे, दयाराम केंद्रे, कुंडलीक सिरसाट, नारायण केंद्रे यांच्या बानिम आणि गुळ्यावर वीज कोसळण्याने गुरांचा चारा जाळून खाक झाला. मुक्या प्राण्यांच्या तोंडचा घास विजांनी काढून घेतल्याने या शेतकऱ्यांच्या समोर गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीज कोसळून म्हशीचा मृत्यू
निलंगा तालुक्यातील केळगाव येथे उत्तम काळे यांच्या शेतात बांधलेल्या म्हशिवर वीज कोसळून म्हैस दगावली. तर अनेक ठिकाणी आंब्यासह पपई तसेच इतर फळ बागांचं नुकसान झालं आहे.
नागरीक, फेरीवाल्यांसह भाजी विक्रेत्यांची मोठी धांदल
शहरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरीक, फेरीवाल्यांसह भाजी विक्रेत्यांची मोठी धांदल उडाली. अनेकांनी इमारीला आडोसा घेतला. दरम्यान, शहरातील अनेक ठिकाणची वीज गेली होती.