राज्यात आगामी ५ दिवस पावसाचे! रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ‘यलो अलर्ट’
मुंबई – राज्याच्या अनेक भागात पुढील ४ ते ५ दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या प्रणालीमुळे राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून आगामी ४-५ दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा १२ टक्के जास्त पाऊस पडला असून मराठवाड्यात तब्बल ३२ टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे. विदर्भात सरासरीच्या १ टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर येथे अतिरिक्त पावसाची नोंद झाली, तर जालन्यात ६९ टक्के जास्त पाऊस पडला. त्यानंतर आता सोमवारपर्यंत रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात रविवारी आणि सोमवारी तुरळक पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव येथे शनिवारी पावसाचा जोर वाढेल. नाशिक, पुणे, सातारा या परिसरात शनिवार ते सोमवार तुरळक पावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे सोमवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे, असे वेधशाळेने म्हटले आहे.