पुणे शहरातील येवलेवाडी कारखान्यात मोठा अपघात
गाडीतून काचा उतरवताना काचेच्या पेटीखाली काही कामगार दाबले
पुणे : पुणे शहरातील येवलेवाडी येथील कारखान्यात मोठा अपघात झाला. काचेच्या कारखान्यात हा अपघात झाला. गाडीतून काचा उतरवताना काचेच्या पेटीखाली काही कामगार दाबले गेले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. येवलेवाडीतील इंडिया ग्लास या काचेच्या कंपनीत ही दुर्घटना घडली आहे. मृत्यू झालेले चौघे कामगार उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहेत.
अशी घडली घटना
येवलेवाडी येथे दुपारी एक ते दीडच्या दरम्यान ही घटना घडली. या ठिकाणी असलेल्या एका काचेच्या कारखान्यात माल उतरताना काचा फुटल्या. त्यात काचेच्या पेटीखाली काही कामगार अडकल्याची माहिती कोंढवा भागातील अग्निशामक दलाला मिळाली होती. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काचेच्या पेटीखाली दाबले गेलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढले. त्यातील चार जण अस्वस्थ होते. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु दाबले गेलेल्या सहा कामगारांपैकी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू आहे. एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे.
पुणे अग्निशमन विभागातील कोंढवा स्टेशन अधिकारी समीर शेख यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, रविवारी दुपारी येवलेवाडी भागातील कारखान्यात अपघात झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळी काही लोक काचेच्या पेटीखाली दबले होते. त्या पेट्यांचे वजन खूप होते. एका पेटीचे वजन दोन ते अडीच टन होते. त्यातील चार जण पेटीखाली दाबले गेले होते.
या चौघांचा मृत्यू
येवलेवाडी कारखान्यात काम करणारे पवन रामचंद्र कुमार (वय ४०), धमेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०), विकास प्रसाद गौतम (वय २३), अमित शिवशंकर कुमार (वय २७ ) या चौघांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व कामगार उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. तसेच या अपघातात मोनेसर कोळी (वय ३१) आणि जगतपाल संतराम कुमार (वय ४१) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
येवलेवाडी येथील भागात अनेक कंपन्या आहे. त्यातील अनेक कंपन्या अनधिकृत आहे. त्यांच्याकडे परवाने नाही. तसेच शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन या ठिकाणी होत नाही. कंपनीत कामावर असलेल्या कर्मचारी आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे रविवारी घडलेल्या घटनेवरुन स्पष्ट होत आहे.




