मध्यावधी निवडणुकांची शक्यता -उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व घरोघरी जावे, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलत होते. त्यात त्यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करून कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत ठाकरे यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. गेल्या चार-पाच दिवसांत ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ निहाय तयारीचा आढावा घेण्यासही सुरुवात केली आहे.
राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठय़ा घोषणा करायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्येही त्यांनी मोठे प्रकल्प व गुंतवणुकीच्या घोषणा केल्या व निवडणुका जाहीर झाल्या. राज्यातील सरकारमध्ये अस्थिरता असून काही आमदार नाराज असून फुटण्याचा विचार करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही काळाने अपेक्षित आहे. या पाश्र्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांची शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आपले सरकार असताना केलेली कामगिरी घरोघरी पोचविण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. दरम्यान, ठाकरे यांनी आमदार फुटू नये, म्हणून मध्यावधी निवडणुकीचे भाकीत केल्याची टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.