‘या’ १२ किल्ल्यांचे संवर्धन होणार; केंद्राकडून कृती आराखडा जाहीर

मुंबई: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या राज्यातील ११ आणि तामिळनाडूनतील एक अशा १२ ऐतिहासिक मराठा किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने तीन टप्प्यांचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केला आहे. यातून स्थानिक पर्यटनालाही मोठी संधी मिळणार असल्याची माहिती भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार चव्हाण यांनी राज्यसभेत विशेष उल्लेख व प्रश्नाच्या माध्यमातून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या राज्यातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामीळनाडूतील जिंजी या किल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय उपस्थित केला होता. त्याला केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
हेही वाचा – पतसंस्थांमध्ये राज्यभरात ९० हजार ५०० कोटींच्या ठेवी; विमा कंपन्यांचे संरक्षण मिळणार, सरकारने मागवला प्रस्ताव
केंद्र सरकारने या १२ मराठा किल्ल्यांचे जतन, पुनर्संचयितीकरण, पर्यटन सुविधा विकसित करणे आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात ६ महिने ते २ वर्षांचा अल्पकालीन टप्पा, २ ते ५ वर्षांचा मध्यम कालावधीचा टप्पा आणि ५ ते १० वर्षांचा दीर्घकालीन टप्पा असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. या तीन टप्प्यांत प्रशासकीय संरचना मजबूत करणे, किल्ल्यांवरील मूलभूत पायाभूत सुविधा उभारणे, पर्यटक मार्गदर्शन व माहिती प्रणाली विकसित करणे, पर्यटन सुविधा वाढविणे, उत्खनन व संवर्धनाची कामे करणे, आपत्ती व जोखीम व्यवस्थापन तसेच किल्ल्यांचे दीर्घकालीन संवर्धन, परिसर व पर्यावरण व्यवस्थापन अशी विविध कामे केली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठा किल्ल्यांच्या जतनाबरोबरच स्थानिक समुदायाच्या सहभागातून पर्यटनाला चालना मिळण्याची आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





