राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी शनिवारी मतदान पूर्ण झाले. आता या निवडणुकीचे निकाल आज (दि.9) जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहापासून सुरु होणार असल्याची माहिती दिली जात आहे. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचे कल समोर येणार आहेत. यामुळे राज्यभरातील ७४३८ उमेदवारांची धाकधूक आणखी वाढली आहे.
निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमानुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता या निवडणुकीत राज्यभरातील ७४३८ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले आहे. १२ जिल्हा परिषद क्षेत्रात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून, त्यानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे.
राज्य आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजेपर्यंत अंदाजे ३७.९४% मतदान झाले होते. रायगड, सोलापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ईव्हीएम संदर्भात तक्रारी समोर आल्या असून, अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प झाली होती. पण नंतर प्रशासनाकडून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली.
काही ठिकाणी सकाळच्या वेळेत मतदार यादीतील नावांबाबत किरकोळ गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाने तातडीने मदत कक्ष सक्रिय करून समस्या सोडवल्याने मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी राखीव यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
स्थानिक प्रश्नांवर मतदारांनी मतदान केल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास हे मुद्दे केंद्रस्थानी असल्याचे मतदारांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाले. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आज प्रत्यक्ष निर्णयाचा दिवस असल्याची भावना सर्वत्र जाणवत होती.




