नव्या संसदभवनाच्या इमारतीला गळती; संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
मुंबई | जेमतेम वर्षभरापूर्वी बांधून पूर्ण झालेल्या नव्या संसद भवनाला गळती लागली आहे. बुधवारी झालेल्या पावसामध्ये खासदारांच्या एका लॉबीत छतातून पाणी टपकू लागल्याने तेथे बादली ठेवण्याची वेळ आली. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, जुनी इमारत सुस्थिती होती. ती अजून अनेक वर्षे चालली असती. त्यात कामकाज होऊ शकले असते. ग्रीक आणि इतर देशांच्या संसद इमारती जुन्या आहेत. ही इमारत बांधून एक वर्ष होत आहे. तर राम मंदिर बांधून एक वर्ष झाले आहे. पण एकाच पावसात नवीन संसद इमारतीला गळती लागली. आमच्या कार संसद आवारात आल्या त्यावेळी पाणी होते. राम मंदिरात पाणी गळत आहे. पावसामुळे विमानतळात पडझड झाली. सरकार आहे कुठे? असा प्रश्न त्यांनी विचारला. ठेकेदारांना काम दिल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. या ठेकेदारांचा आणि सरकारचा हिशोब झाला पाहिजे, हे ठेकदार कोण आहेत. ते कोणत्या राज्यातील आहे हे एकदा समोर आले पाहिजे. कोणाला किती कमिशन मिळाले याचा हिशोब झाला पाहिजे.
हेही वाचा – अमोल मिटकरीची लायकी काय? अमोल मिटकरी-अमेय खोपकरांमध्ये जुंपली
विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहिणींचा जो उमाळा आला आहे, तो केवळ दोन महिन्यांसाठी आहे. दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा करतील आणि मग हे तिघेही पळून जातील असा जिव्हारी लागणारा टोला त्यांनी हाणला. लाडक्या बहिणी योजनेचा पैसा हा तिजोरीतील आहे. तर फुटलेल्या आमदारांसाठीचा पैसा हा ठेकेदारीचा पैसा आहे, असंही संजय राऊत म्हणाले.