लग्न एकाशी, प्रेम दुसऱ्याशी तर लग्न कसे टिकणार? प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Prakash Ambedkar | राज्यातील बदलत्या सत्ता-समीकरणांवर भाष्य करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. लग्न एकाशी आणि प्रेम दुसऱ्याशी असेल, तर ते लग्न कसे टिकणार? अशा खोचक शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन्ही भावांच्या युतीत तडा गेल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, महापालिका निवडणुकांनंतर राज्यात सत्ता मिळवण्यासाठी तत्त्व, निष्ठा आणि विचारसरणी बाजूला ठेवून अनेक विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. निवडणुकांत एकमेकांविरोधात लढलेले पक्षही सत्तेसाठी हातमिळवणी करत असल्याचे चित्र विविध महापालिकांमध्ये दिसून येत आहे.
हेही वाचा : एसटी बसमधून बनावट दिव्यांग ओळखपत्रावर प्रवास… थेट गुन्हा दाखल होणार !
ते पुढे म्हणाले, निवडणुकीपूर्वीपासून सांगत आहे, कोण कसा फिरेल आणि कोण कसा, कुणाला पाठिंबा देईल? हे सांगणे कठीण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मी त्यामध्ये असं गृहीत धरून चाललो आहे की ‘इंडिकेशन’ एक आहे, ज्याही आघाडीत काही खरे नाही, आमच्या पक्षाचे फारूक अहमद यांनी एक महत्त्वाची माहिती दिली होती, त्यावर ते ठाम होते. मिश्रा नावाची एक व्यक्ती ही उद्धव ठाकरेंना क्रमांक एक आणि दोनच्या वतीने भेटण्यात गेली होती. ही माहिती खरी आहे असे आम्ही मानतो. याचे कारण मनसे आता वेगळे जायला लागले आहे. दोन्ही भावांच्या युतीमध्ये तडा गेल्याचे दिसते. लग्न एकाशी प्रेम दुसऱ्याशी तर ते लग्न कसे टिकणार? असा सवाल करत त्यांनी ठाकरे बंधूंवर खरपूस टीका केली.




