नसरापूर अत्याचार प्रकरण : महिलांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही; दोषींना कठोर शिक्षा मिळतच राहील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन चिमुकलीवरील बलात्कार व हत्येच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वागत केले असून, हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. अशा नराधमांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट करणारा आहे.”
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’ प्रश्नावर महिनाभरात समन्वय समिती
त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येक महिला आणि मुलीची सुरक्षितता ही राज्य शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांच्या प्रत्येक प्रकरणात सरकार अत्यंत संवेदनशीलतेने आणि ठाम भूमिकेतून कारवाई करत आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा निर्धार कायम राहील.”
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजालाही जबाबदारीची जाणीव करून देत सांगितले की, “या प्रकरणात पीडितेला न्याय मिळाला असला, तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाज, कुटुंब, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन या सर्वांनी अधिक सजग राहून महिलांच्या व बालकांच्या सुरक्षिततेसाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
नसरापूर प्रकरणातील न्यायालयीन निर्णयामुळे राज्यात महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांबाबत कठोर संदेश गेला असून, अशा गुन्ह्यांबाबत सरकारची शून्य-सहनशीलतेची भूमिका कायम असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केला.





