मनोज जरांगेंचं मराठा समाजाल भावनिक आवाहन; म्हणाले, मी शेवटच्या घटका..
![Manoj Jarange Patil said that I will never leave the Maratha community till the last element](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Manoj-Jarange-Patil-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाला संबोधित करत असताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मी तुमच्यासाठी खंबीर आहे. माझी समाजाकडे काहीही अपेक्षा नाही. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी मी जीव हातावर घेतला आहे. शेवटच्या घटका पर्यंत मराठा समाजाला कधीही सोडणार नाही, असं म्हणत मनोज जरांगेंना अश्रू अनावर झाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, कोणताही पक्ष आणि तुमचा नेता मराठ्यांच्या जातीला आणि तुमच्या मुलांना कधीच मोठं करणार नाही. मी तुम्हाला हे तळतळून सांगतो. तुम्ही फक्त जातील बाप माना, नेत्यांना बाप मानायचं बंद करा. तुमचे मुलं तुम्हाला आयपीएस आणि आयएएस दर्जाचे अधिकारी पाहायचे असतील तर स्वत:चे मुलं मोठे करण्यासाठी लढायला लागा. त्यानंतर जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत आणि प्रगतशील जात म्हणून फक्त मराठ्याची जात असेल.
हेही वाचा – नैसर्गिक आपत्तीमध्ये तळवडे परिसरातील नागरिकांना ‘दिलासा’
मी खंबीर आणि कणखर आहे. मी मागे हटत नाही. तुम्ही काळजी करु नका. मला फक्त उपोषणाच्या आणि शरीराच्या वेदना आहेत. बाकीच्या वेदनांना मी खंबीर आहे. माझी समाजाकडून काहीही अपेक्षा नाही. मला समाजाचा एक रुपयाही नको. फक्त समाजाचे पोरं मोठे करण्यासाठी मी जीव तळ हातावर घेतलेला आहे. संपूर्ण सरकार माझ्या मागे लागलंय. विरोधी पक्ष माझ्या मागे लागला आहे. पण मी मागे हटत नाही आणि हटणारही नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मी शेवटचं समाजाला सांगतो की, माझ्यावर सरकारने कधी हल्ला केला तर, कारण मी कुठेही फिरत असतो. मी आजच पुण्याला जाणार आहे. कुठेही जिवघेणा हल्ला केला आणि मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द फक्त मराठा आणि मराठा आरक्षण हेच असतील. मी शेवटच्या घटका मोजेल पण मी कधीही मराठा समाजाला सोडणार नाही. मला खूप वेदना होयला लागल्या तरीही मी समाजाला सोडून देतो, असं म्हणणार नाही. मराठा समाजाची शान मी कधीही कमी होऊ देणार नाही, असं भावनिक आवाहनही मनोज जरांगे यांनी यावेळी केलं.