‘विजयी मेळाव्यात रुदालीचं भाषणही झालं’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा मराठी एकजुटीचा विजयी मेळावा मुंबईत पार पडला. अनाजीपंतांनी आमच्यातला आंतरपाट दूर केला अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मी राज ठाकरेंचे आभार मानतो. कारण त्यांनी दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय त्यांनी मला दिलं. कुठेतरी श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. मला सांगण्यात आलं होतं की विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषणही झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पाडलं, आम्हाला सत्ता द्या, निवडून द्या हा काही मराठीचा विजय नव्हता, ही रुदाली होतं. या रुदालीचं दर्शन त्या ठिकाणी आपण घेतलं आहे. मुळात त्यांना असूया आहे की २५ वर्षे महापालिका असताना दाखवण्यालायक ते काहीही काम करु शकले नाहीत.
हेही वाचा : मौजे डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्त्याला ‘गती’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलला ते सगळ्यांनी पाहिलं. त्यांच्या काळात मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळ, अभ्युदय नगर, पत्रा चाळ येथील मराठी माणसांना त्याच ठिकाणी घर दिलं याची असूया त्यांच्या मनात आहे. मुंबईतला मराठी माणूस असो की अमराठी सगळेच आमच्या बरोबर आहेत. आम्ही मराठी आहोत, मराठी असण्याचा अभिमान आहे. आम्ही हिंदुत्वववादी आहेत. हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.