प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीत दुबार मतदारांची संख्या अधिक असल्याने हरकती-सूचना नोंदविण्याची मुदत २१ दिवस करण्याची मागणी शिवसेना (ठाकरे) – मनसेकडून करण्यात आली. त्यापाठोपाठ आता काँग्रेसकडूनही प्रारूप मतदार याद्यांवर हरकत आणि सूचना घेण्यासाठी दिलेली ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी असून ती १५ दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या याद्यांवर हरकती आणि सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुदतवाढीचा मागणी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी याबाबत आयोगाला पत्र लिहिले आहे. अनेक महानगरपालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पद्धतीने फोडलेल्या नाहीत. बऱ्याच मतदारांची नावे राहत असलेल्या भागांतून इतर भागांमध्ये गेलेली आहेत, ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हरकती घेण्याची पद्धत देखील अत्यंत किचकट आहे. प्रत्येक मतदाराने विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असून सोबत आधारकार्ड जोडायचे आहे, ही पद्धत वेळकाढू आहे, असे पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा – निवडणूकीपुर्वी संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपडे पार पडेल.! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास
कोणत्याही व्यक्ती वा राजकीय पक्षाने निवडणुकीच्या सक्षम अधिकाऱ्याच्या निदर्शनास योग्य ती हरकत आणि सूचना आणून दिल्यास अनेक व्यक्तींबद्दलीची तक्रार स्वीकारली पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाही. मतदार याद्यांबाबत स्पष्टता आणि पारदर्शकता येण्यासाठी राजकीय पक्षांच्या तसेच प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.




