पंतप्रधान मोदींचा रत्नागिरीतील आंबा बागायतदाराशी संवाद
रत्नागिरी |
पीएम किसान योजनेच्या नवव्या टप्प्याच्या शुभारंभानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रत्नागिरीतील आंबा बागायतदार देवेंद्र झापडेकर यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी देशाच्या निरनिराळ्या राज्यांमधील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यामध्ये झापडेकर यांचा समावेश होता.
सिव्हिल इंजिनीअरिंगची पदविका घेतलेल्या झापडेकर यांनी वडिलांचा शेतीचा व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. सरकारी योजनेअंतर्गत आंबा पिकवण्याच्या केंद्रासाठी (मँगो रायपनिंग चेंबर) कर्ज मिळाले. बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर येथील शाखेतील कर्ज घेण्याचा अनुभव चांगला असल्याचे त्यांनी पंतप्रधनांना सांगितले. त्यांच्या अनुभवातून बाकीच्याही शेतकऱ्यांना प्रेरणा घेता येईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. याप्रसंगी मोदी यांनी झापडेकर यांना, आंबा उद्योगासाठी ते कसे प्रेरित झाले आणि यशस्वी कसे झाले याबाबत प्रश्न विचारला. झापडेकर यांनी आंबा प्रक्रिया उद्योगाचा तपशील सांगून हापूस आंब्याला दरही चांगला मिळत असल्याचे सांगितले.
सहा मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या या संवादामधून झापडेकर यांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही आईची इच्छा पूर्ण करत स्वत: यशस्वी उद्योजक बनला आहात. शेतीमुळे एवढा मोठा बदल तुमच्यामध्ये झाला आहे. या प्रकल्पामुळे तुमच्या कुटुंबाचेच नव्हे, तर सहकारी शेतकऱ्यांचेही भले केले आहे. तुम्ही राबवलेल्या प्रकल्पामुळे अन्य शेतकऱ्यांपुढे आदर्श दिला आहे. सहा वर्षांपूर्वी गरीब शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. अनेक अडचणी येत होत्या. आता ती परिस्थिती बदलली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही पंतप्रधानांनी बजावले.