तंत्रज्ञान विकसित होताना मानवी मेंदूचे महत्त्व विसरता कामा नये : डॉ. आदित्य अभ्यंकर
शिक्षण विश्व: प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजतर्फे विज्ञान दिनानिमित्त कार्यशाळा

पिंपरी- चिंचवड | जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित होत आहे. विकसित होणारे तंत्रज्ञान काळाबरोबर आत्मसात करणे ही गरज बनत चालली आहे मात्र तंत्रज्ञानाबरोबरच मानवी मेंदूची उपयुक्तता आणि महत्व विसरता कामा नये असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभाग प्रमुख व अभ्यासक वक्ते डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले.
चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज च्या वतीने महाविद्यालयात शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी व प्राध्यापकासाठी संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याची साधने व उपयुक्तता या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे डीन व अभ्यासक वक्ते डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर यावेळी उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, विभाग प्रमुख डॉ. जयश्री मुळे, डॉ. राजश्री ननावरे, प्रा. जयश्री कांबळे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज यांच्या हस्ते प्रमुख वक्ते डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्या शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. रसिका पाटील यांनी केले. स्वागतपर मनोगत उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी केले तर आभार प्रा. जयश्री कांबळे यांनी मानले.
हेही वाचा : ‘धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला उशीर’; पंकजा मुंडेंचं वक्तव्य
प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय ) रोबोट्स कसे काम करते. त्याचा वापर कसा करता येईल, या बाबतीत माहीती देताना म्हणाले आपल्याला हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे .त्याचे प्रमुख कारण जगभरात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. ते आपण शिकून आत्मसात केले नाही तर , भविष्यात दिवसें गणित आपल्याला अवघड होत जाईल .यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ( एनआय ) रोबोट्स, त्याची साधने व त्याची उपयुक्तता याबाबतीत सखोल ज्ञान प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतलेच पाहिजे . ही काळाचीच देखील गरज आहे.
तंत्रज्ञान ताब्याबाहेर जाता कामा नये
डॉ.अभ्यंकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या संभाव्य धोक्याबद्दल देखील सतर्क केले. ते म्हणाले, आज कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट्स वापरताना आपल्याकडील नैसर्गिक बुद्धिमत्ता मानवी मेंदूचा वापर कमी होत चाललेला आहे .हा एक धोका देखील आहे . तसेच भविष्यात जर ही सर्व यंत्रे , नवीन तंत्रज्ञान मानवी नियंत्रणाच्या ताब्याबाहेर गेली तर , त्यावर नियंत्रण मिळविणे देखील अवघड होईल. मग धोकादायक परिस्थिती निर्माण होईल. यासाठी नव्या युगात कार्यरत असताना आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता मानवी मेंदू घासून पुसून जागरूकपणे स्वच्छ ठेवण्याची देखील आवश्यकता आहे .असे सांगून डॉ. अभ्यंकर पुढे म्हणाले, वैज्ञानिक जगासमोर आपली मते मांडताना म्हणतात, संशोधनासारखे पवित्र व शुद्ध दुसरे काहीच नाही त्यातूनच ज्ञान प्राप्ती मिळू शकते.