Civic issues: पुनावळे अंडरपासची ‘‘कोंडी’’ कधी सुटणार?
वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी : नवनिर्वाचित नगरसेवकांकडून कार्यवाहीची अपेक्षा
पिंपरी-चिंचवड: पुणे-मुंबई महामार्गावरील पुनावळे अंडरपास वाहतूक जाममुळे वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. सकाळी आणि संध्याकाळी ट्रॅफिक रांगा अनेक किलोमीटरपर्यंत वाढल्याने दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून भाजपाचे चार नगरसेवक – राहुल कलाटे, कुणाल व्हावळकर, श्रृती वाकडकर आणि रेश्मा भुजबळ – निवडून आले आहेत. नागरिक आता या नगरसेवकांकडून तातडीने कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
स्थानीय नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, कमीतकमी सहा ट्रॅफिक पोलीस सकाळी व संध्याकाळी तैनात करावेत, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून वाहतुकीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. याशिवाय, अंडरपासच्या बाजूला पडलेली रेती, खडी आणि तुटलेले फुटपाथ वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. नागरिकांनी साप्ताहिक सफाई आणि दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
“लोकसंख्या वाढत आहे, रस्त्यांचा दर्जा राखणे आणि वाहतूक नियमन करणे अत्यावश्यक आहे. पुनावळेतून जांबे आणि परिसरात जाण्यासाठी अंडरग्राउंड मार्गाचा विकास दीर्घकालीन उपाययोजना करणे अपेक्षीत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाय न केल्यास भविष्यातील विकासाचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचणार नाहीत. पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. आम्ही कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुनावळे अंडरपास येथे पोलीस पाहिजेत आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावावे. दुसरी गोष्ट, लोकप्रतिनिधी आता निवडून आले आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अंडरग्राउंड मार्ग लवकरात लवकर मोठा कसा होईल याकडे लक्ष द्यावे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हजारो फ्लॅट्स होत आहेत पण रस्ता वाढत नाहीये, त्यामुळे विकास करणे गरजेचे आहे. हा रस्ता झाल्यामुळे, बाजूला पडलेली पाच-पाच फूट रेतीवाळू खडी वाहनांना स्लिप करुन टाकते; विशेषत: दोनचाकी वाहनचालकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्याची सफाई पंधरा दिवसातून नियमित करावी अशी मागणी आहे.
— बाळकृष्ण सुर्वे, स्थानिक नागरिक.




