पिंपरी-चिंचवडमध्ये बेफाम टिप्परचा थरार; एकाच दिवशी तीन भीषण अपघातांनी शहर हादरले!
एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर : आमदार अमित गोरखे ‘ॲक्शन मोड’मध्ये!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड, ०६ एप्रिल २०२६:शहरातील बेफाम आणि अनियंत्रित टिप्पर वाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असून, आज एकाच दिवसात झालेल्या तीन भीषण अपघातांनी शहरात संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात आमदार अमित गोरखे यांनी पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका प्रशासनाला यासंदर्भात तातडीने ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
आज शहरात टिप्परच्या धडकेमुळे अपघातांची मालिकाच पाहायला मिळाली. बर्ड व्हॅली चौक येथे झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत नागरिक गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. विशेषतः बर्ड व्हॅली सारख्या वर्दळीच्या ठिकाणी, जिथे बाजूलाच शाळा आहे, तिथे एकाच दिवशी एकाच स्पॉटवर तीन अपघात होणे ही प्रशासनासाठी शरमेची बाब आहे.
ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा उभी करा…
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमित गोरखे यांनी तातडीने वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, पोलीस आयुक्तांशी (CP) आणि महानगरपालिका आयुक्तांशी संपर्क साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बर्ड व्हॅली चौकात शाळेसमोर नेहमीच वाहतूक कोंडी असते. आज तिथे एकाचा मृत्यू झाला, ही घटना मनाला चटका लावणारी आहे. या भागात झेब्रा क्रॉसिंगची अवस्था बिकट झाली आहे, सिग्नल आणि शास्त्रोक्त स्पीड ब्रेकरचा अभाव आहे. पोलिसांना आणि प्रशासनाला मी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, असे ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून तिथे तातडीने ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा उभी करा.
आमदार गोरखे यांची भूमिका
शहरात जड वाहनांवर निर्बंध आणणे आवश्यक आहे. रहिवासी भाग आणि मुख्य चौकांमध्ये टिप्परच्या वेगावर तात्काळ नियंत्रण आणले जावे. ज्या ठिकाणी शाळा आहेत, तिथे तातडीने सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक बसवावेत. गर्दीच्या वेळी जड वाहनांच्या प्रवेशाबाबत प्रशासनाने फेरविचार करून कडक नियमावली करावी. ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी शहरातील अपघातप्रवण क्षेत्रांत पोलिसांची विशेष गस्त आणि कायमस्वरूपी वाहतूक रक्षक नेमण्यात यावेत.
केवळ सांत्वन करण्यापेक्षा या प्रश्नावर ठोस उपाययोजना करणे ही माझी प्राथमिकता आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहेच, पण भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी मी सर्व संबंधित विभागांशी सकारात्मक पाठपुरावा आणि औपचारिक पत्रव्यवहार करत आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने सुधारणा करून रस्ते सुरक्षित करावेत.
– अमित गोरखे, आमदार.





