डोेंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे – मुख्यमंत्री
मुंबई – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी मंत्रालयात दाखल होत येथील पुरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी डोेंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या चार-पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहेत. या सगळ्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचे वचन दिले आहे. एनडीआरएफ, कोस्टगार्डच्या माध्यमातून मदतकार्य आणि बचावकार्य सुरु आहे. धरणे आणि नद्या ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी धरणाचे पाणी सोडावे लागत आहे. ते पाणी कुठे जाईल हे पाहून तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरु आहे. हे सगळे करत असताना कोरोनाचे संकट टळलेले नाही. जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. तळई येथे दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवू शकलो. पण आता 30 ते 35 लोक दुर्देवाने मृत्यूमुखी पडले आहेत. नागपुरातही अतिवृष्टी होत आहे. महाबळेश्वरातही जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या काही वर्षात कधी पडला नाही तेवढा पाऊस पडत आहे. परदेशातही अशा अतिवृष्टी आणि पुराच्या बातम्या आपण पाहत आहोत. हे अनैसर्गिक संकट आहे. बचावकार्य सुरु असताना नागरिकांना आवाहन करतो की, डोेंगर उतारावर जी घरे आहेत तेथील नागरिकांना स्थलांतरीत करत आहोत. स्थलांतर करताना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.