‘बबली मोठी झाली नाही, बबली अजूनही नासमझ’, पेडणेकरांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
मुंबई | नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्याची लायकी नाही. बबली अजूनही नासमझ आहे, असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांवर शाब्दिक वार केलेत. नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेला इशारा दिलाय. महाराष्ट्रातील कुठलाही मतदारसंघ निवडा, मी तुमच्या विरोधात उभी राहणार आहे. तुम्ही जनतेतून निवडून येऊन दाखवा, असं आव्हान नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
त्यावर उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “नवनीत राणा यांच्या इशाऱ्याला हल्लाबोल नाही तर खाज म्हणतात. जाणूनबुजून या महाराष्ट्रात, मुंबईत दंगल परिस्थिती निर्माण करायची ही खाज आहे. याला हल्लाबोल म्हणत नाही. ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण राज्यातच नाही तर देशात त्यांच्या विशेष कामासाठी अव्वल क्रमांकावर आले, ती खरी पोटदुखी आहे. एकाची बेंबीदुखी आहे तर एकाची पोटदुखी आहे. एक भोंगा आहे तर दुसरा सोंगा आहे. त्यांचा अॅप्लिफायर तर वेगळाच आहे. याचाच अर्थ ही खाज आहे. हा हल्लाबोल होऊ शकत नाही”.
मुख्यमंत्र्यांनी स्वत: जनतेपुढे येऊन लढावं, मी त्यांच्या विरोधात लढेल, असं नवनीत राणा म्हणाल्या. त्यावरून किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांची थेट लायकी काढत त्यांना खडसावलं आहे. “लोकशाहीने अधिकार दिलेत म्हणून काहीही नका बोलू. तुम्ही आम्हाला शिकवू नका, तुम्ही खासदार आहात त्याप्रमाणे तुमचं वर्तण असू द्या. आम्हाला वाटलं होतं की बबली मोठी झाली पण, बबली मोठी नाही झालीये. ती अजूनही अल्लड आहे. मागचा अॅप्लिफायर लावला जातोय आणि मग ती खाज वाढतेय. या खाजेवर आमच्याकडे औषध आहे”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
“ठाकरे कुटुंब, मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय यांना प्रसिद्धी मिळूच शकत नाही. शिवसेना अशा आव्हानांमुळे आम्ही अजून उजळू निघू. असे भोंगे आणि सोंगे भाजपला लागणारच. पण आम्ही संघर्षाला घाबरत नाही” असंही त्या म्हणाल्या.