पादचारी नागरिकांचे मोबाईल असुरक्षित
चाकण आणि निगडी येथे मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना
पिंपरी l प्रतिनिधी
रस्त्याने पायी चालत जात असलेल्या नागरिकांचे मोबाईल फोन असुरक्षित झाले आहेत. नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावण्याच्या आणखी दोन घटना चाकण आणि निगडी परिसरात उघडकीस आल्या आहेत.. याप्रकरणी मंगळवारी (दि. 15) अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्नेहा सुभाष कदम (वय 24, रा. कुरुळी फाटा, कुरुळी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 14) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी निघोजे येथे पायी चालत मोबाईल फोनवर बोलत जात होत्या. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातून मोबाईल फोन हिसकावून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर तपास करीत आहेत.
निलेश मधुकर घाडगे (वय 26, रा. श्रीकृष्णनगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 5 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता दत्तवाडी आकुर्डी येथून निगडी स्टॉपकडे पायी चालत जात होते. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील दहा हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. सहाय्यक पोलीस फौजदार कीर्तिकुमार देवरे तपास करीत आहेत.