महाराष्ट्रातील १० जणांना पद्म पुरस्कार
मुंबई | प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली़. केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातील १० जणांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील एकाला पद्मविभूषण, दोघांना पद्मभूषण, तर सात जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापैकी डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर ‘टाटा’सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आणि ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. हिंमतराव बावसकर, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. भीमसेन सिंघल आणि डॉ. बालाजी तांबे यांना आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी तर गायिका सुलोचना चव्हाण आणि गायक सोनू निगम यांना कला क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अनिल कुमार राजवंशी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे.
१२८ पद्म पुरस्कारांमध्ये चार पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.