हिंगोलीत प्राणवायू खाटा रिकाम्या; रुग्णसंख्या घटली
हिंगोली |
जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असून शासकीय व खासगी रुग्णालयांतही करोना रुग्णांची संख्या घटली आहे. प्राणवायू खाटासाठी एकेकाळी मारामार होती. आता ४३२ खाटा रिकाम्या झाल्या आहेत. सक्रिय रुग्णसंख्या ४६७ वर आली आहे. मृत्यूचा आकडा ३४५ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात शासकीय ७ कोविड सेंटर आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयात ९२ रुग्ण दाखल असून यापैकी ८२ प्राणवायूवर आहेत. याठिकाणी प्राणवायूचे ५६ तर साध्या ६२ खाटा रिकाम्या आहेत. नवीन कोविड सेंटरमध्ये १६ प्राणवायू वरील २८ सौम्य लक्षणाचे रुग्ण दाखल आहेत. येथे ४६ खाटा रिकाम्या आहेत.
कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात प्राणवायूवरील १७,साधे २४ रुग्ण असून ८३ प्राणवायू खाटा रिकाम्या आहेत. वसमतलाही साधे १० तर प्राणवायूवर ८ रुग्ण आहेत. ४२ प्राणवायू खाटा रिकाम्या आहेत. सिद्धेश्वर येथे १३ साधे तर ४ प्राणवायूवरील रुग्ण आहेत. २३ खाटा रिकाम्या आहे. कौठा येथे १२ साधे तर २२ प्राणवायूवरील रुग्ण दाखल आहेत.१ प्राणवायू खाट रिकामी आहे. आयटीआय वसमत येथे सर्व ५० प्राणवायू खाटा रिकाम्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात १४ खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर चालविण्यास मान्यता दिली होती. या रुग्णालयांनी एकूण ३३२ खाटांची मान्यता घेतली होती. यातील सहा वसमतचे तर उर्वरित रुग्णालये हिंगोलीतील आहेत.
- सात रुग्ण दगावले
जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण चिंता वाढविणारे आहे.बुधवारी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालावरून नवे ३३ रुग्ण आले तर ५९ रुग्ण बरे झाले. आजपर्यंत एकूण आलेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ५११ वर पोहोचली. त्यापैकी १४ हजार ६९९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
वाचा- शिवसेनेला धक्का! मुक्ताईनगरचा वचपा काढला माथेरानमध्ये; शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश