अन्यथा दानवे कुटुंबातील सदस्यांचे केशवपान करणार नाही; नाभिक समाजाचा इशारा
मुंबई | केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाची खिल्ली उडवल्याप्रकरणी नाभिक समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या कुुटंबातील सदस्यांचे केशवपान केले जाणार नसल्याचा इशारा पिंपरी-चिंचवडमधील बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप गुरव यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीवर सरकारवर टीका करताना रावसाहेब यांची जिभ घसरली होती. “महाविकास आघाडीच्या सरकारमधील तिन्ही पक्षांची अवस्था ही तिरुपतीमधील न्हावी (नाभिक) सारखी झाली आहे,” असं ते म्हणाल होते. यामुळं नाभिक समाज आक्रमक झाला आहे. राज्यभर दानवे यांच्या विरोधात निदर्शने करत आंदोलन केली जात आहेत. तसेच, रावसाहेब दानवे यांचा अर्धमुंडन आणि अर्धी मिशी असलेल्या फोटो झळकवून निषेध केला आहे. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
बाराबलुतेदार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रताप गुरव म्हणाले की, “गेल्या आठवड्यात रावसाहेब दानवेंकडून नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. हे योग्य नाही, नेहमीच अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत. बाराबलुतेदार हे लोकांची सेवा करतात. उठसुठ आम्हाला बोललं जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी वापरलेले शब्द अतिशय निंदनीय आहेत. त्यांनी जर माफी मागितली नाही तर नाभिक समाज त्यांच्या घरासमोर मुंडन आंदोलन करेल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे केशवपन (हेअर कट) केले जाणार नाही. त्यानंतर त्यांना नाभिक समाजाची किंमत कळेल. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी नाभिक समाज आणि बाराबलुतेदार महासंघाने केली आहे.”