उत्तर कोल्हापुरात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपचं काय
कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी सध्या सुरू असून यामध्ये १४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यानुसार आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या आघाडीवर असून भाजपचे सत्यजित कदम हे पिछाडीवर आहेत. महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा अंत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार असंच काहीसं चित्र सध्या कोल्हापुरात पाहायला मिळतं.
आतापर्यंत निकालानुसार, मतमोजणीच्या चौदाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ५४५६३ मतं मिळाली असून भाजपचे सत्यजित कदम हे ४२२९७ मतांवर आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच जयश्री जाधव या आघाडीवर असल्यामुळे त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू असून भाजपला पराभव स्वीकारावा लागू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
खरंतर, राज्य पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांची प्रचारात उतरलेली फौज, आरोप प्रत्यारोपाने तापलेले राजकीय तापावरण यामुळे अतिशय चुरशीने ६१ टक्के मतदान झाले होते. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात झालेल्या या निवडणुकीत हिंदूत्व, स्वाभिमान असे मुद्दे प्रचारात आले होते.
महाविकास आघाडी भक्कम असल्याचा पुरावा देण्यासाठी आघाडीच्या नेत्यांना ही निवडणूक महत्त्वाची आहे. यामुळे निकाल जर मविआ सरकारच्या बाजूने लागला तर भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागणार आहे? त्यामुळे अतिंम निकाल काय हाती येणार? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.