ओबीसी आरक्षण हेच राष्ट्रवादीचं लक्ष्य, आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको – शरद पवार
मुंबई: ओबीसी आरक्षण हेच राष्ट्रवादीचं लक्ष्य असून आहे. ओबीसी राजकीय आरक्षण मिळेपर्यंत, निवडणुका नको, अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडली. आज मुंबईत राष्ट्रवादीकडून ओबीसी आरक्षण राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
“ओबीसी आरक्षण हेच राष्ट्रवादीचं लक्ष्य असून आहे. हीच आमची भूमिका आहे. देशात अस्वस्थता आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत निवडणूका नको, अशी भूमिका राष्ट्रवादीची असून महाविकास आघाडी सरकारमधील नेतेही याच भूमिकेसोबत असतील”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. समाजाची उपेक्षा टाळण्यासाठी आरक्षण द्यायलाच हवे, असंही ते म्हणाले.
जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही – शरद पवार
“जोपर्यंत सन्मानाने आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरुच ठेवण्याची गरज आहे. अनेक लोक प्रश्न उपस्थित करताता की यांची नेमकी लोकसंख्या किती, त्यासाठी काय करायचं, तेवढी लोकसंख्या आहे की नाही, अशी शंका उपस्थित करतात. मला आनंद आहे की तुम्ही या परिषदेत एक याचिका मान्य केली. केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. एकदा कळू द्या देशाला की नक्की काय संख्या आहे, सत्य काय ते समोर येऊ द्या, पण जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले.