राज्यात १४ जिल्ह्यांतील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर!
मुंबई – राज्यात गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी प्रथमच आतापर्यंतची सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या ८८९ इतकी नोंदवली गेली. त्याचप्रमाणे राज्यातील १४ जिल्ह्यांत दैनंदिन रुग्णसंख्या शून्यावर असून १२ जिल्ह्यांत दैनंदिन रुग्णसंख्या एक अंकी इतकी नोंदली गेली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि रत्नागिरी वगळता कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ८८९ नवे रुग्ण आढळून आले. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १ हजार ५८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत एकूण ६६ लाख ३ हजार ८५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ६४ लाख ३७ हजार २५ जणांनी कोरोनावर मात केली. राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, आपल्याला राज्यात सामूहिक प्रतिकारशक्तीचा फायदा दिसून येत आहे. पहिल्या लाटेदरम्यान सुमारे १७ लाख, तर दुसऱ्या लाटेत तब्बल ५० लाख रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर लसीकरणाला वेग दिल्यामुळे परिस्थिती निवळत गेल्याचे समोर येत आहे. देशात तसेच राज्यात तरी अद्याप विषाणूतील बदल दिसून आलेले नाहीत. अर्थात पुढे ते होणारच नाहीत, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सावधगिरी, कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन आवश्यक आहे. आपल्या लसीकरण उपक्रमातून सामूहिक प्रतिकारशक्तीचा फायदा दिसून येत आहे, असे चित्र दिसत आहे.