आता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार
मुंबई – अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) हे दोन विषय गाभा समजले जातात. मात्र आता बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवं धोरण जाहीर केलं असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नव्या धोरणानुसार आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत. तसेच AICTE संस्थेने आता १४ विषयांची यादी जाहीर केली असून इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा समावेश असेल. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी AICTE ने एक हँडबुक जारी केलं असून त्यातही याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातून विरोध होताना दिसत आहे. गणित हा विषय अभियांत्रिकीच्या सर्व विषयांचा पाया आहे. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी गणिताचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात हा विषय चर्चेचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.